Sunday 13 October 2013

तमिळ तेरीयादी ...एन तमिळ रोंबा मोसम!

२५ मे २०१२ -
मद्र देशावरील वायुमार्ग स्वारीसाठी अस्मादिक पुणे विमानतळावर पोहोचले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते. चेक-इन करताना दारातच एका सुमारे दहा लोकांच्या लुंगी ग्यांगने माझे स्वागत केले, मध्ये पाच मोठे गजरे आणि तीन लहान वेण्याही होत्या. या लोकांच्या मागे मी जवळ जवळ दहा  मिनिटे अडकून पडलो. कारण कुणाचे तिकीट सापडत नव्हते तर कुणाच्या पोरासोरांचा हिशेब लागत नव्हता. सरतेशेवटी एका छोट्या फटीमधून मी आत घुसलो. सिक्युरिटीकडे चालत असता "गल्फमध्ये जाताना खस-खस नेऊ नये" अशी एक मराठीत पाटी आहे. ती पाहून माझ्या मनात जरा खस-खस पिकली एवढेच. गल्फला जात असतो तर कदाचित मेटल डिटेक्टरमध्ये पकडला गेलो असतो!

थोडी घुसाघुशी करून वेटिंग एरीआत स्थानापन्न होतोय तोवर पुन्हा त्या लुंग्या व गजरे, वेण्या इत्यादी हजर झाले. त्यांनी आपले डबे उघडून सांबर-डोश्यावर ताव मारावयास सुरुवात केली. यामुळे तिथे एक सामुदायिक मसालेदार सुगंध दरवळू लागला. यात एका शीटवर सांबर सांडल्यानंतर "ए पलीकडे जाऊन खा बघू तू " अशा अर्थाच्या सूचना मिळाल्या.  यानंतर बरेच लोक ते सामुदायिक भोजन होण्याची वाट बघत बसले. सरतेशेवटी विमानात बसण्याची सूचना झाली व आम्ही निघालो. मधली सीट मिळाल्याने हालचाल करणे अशक्य होते व झोप घेणेही. थोडा टाइमपास म्हणून मग मी एक चहा घेतला. अर्थात तो फुकट न्हवता. ३० रु. मध्ये मला फुल कप चहा मिळाला! दीड तासाच्या कंटाळवाण्या फ्लाईट नंतर आणि ब्याग येण्यात अर्धा तास गेल्यानंतर दीड वाजता मी बाहेर पडलो.

तोपर्यंत राज ट्रव्हलच्या राजकुमार नावाच्या एका राजबिंड्या चालकाने मला तीनदा फोन केला होता.
त्याचे इंग्लिश चांगले होते हे नशीब! कारण तो कुठल्या खांबापाशी उभा आहे हे त्याने फक्त तिसऱ्या  वेळेस मला सांगितले तेव्हा समजले. यानंतर शोलीन्गानाल्लूर असे लम्बेचवडे नाव असलेल्या भागातील लांकोर नावाच्या गेस्ट हाउस च्या पार्किंग मध्ये त्याने मला आणून सोडले. या प्रचंड सोसायटीमध्ये दोन तीनदा जिने चढल्यावर मी योग्य घरात पोहोचलो. गौतम नावाच्या नेपाळी कूकने मला माझी खोली दाखवली.

सकाळी उशीरा  उठलो. कमल नावाचा अजून एक नेपाली मुलगा इथे राहत होता, त्याने मला ब्रेंड बटर चहा असा नाश्ता आणून दिला. त्यावर ताव मारून, आवरा  आवर करून मी मेन रोड वर आलो. इथून मला सिरुसेरी नावाच्या ऑफिस मध्ये जायचे होते. नशिबाने एक हिंदी जाणणारा माणूस भेटला, त्याच्याबरोबर मी शेअर्ड ऑटो मध्ये बसून सिरुसेरी ला पोहोचलो. या ऑटो मध्ये ८ लोक बसतात. ४ मागे सीट वर आणि ४ त्यांच्या पायात. ४ कन्यांच्या पायाशी बसून, एक पाय बाहेर सोडून चेन्नई दर्शन करत शेवटी ऑफिस आले. रिक्षा वाल्याने काही तमिळ शब्द उद्गारले, मी ५० ची नोट हातात ठेवली. त्याने २० रु परत दिले, त्यावरून तो ३० द्या असे म्हणाला असावा. पुढचे तीन दिवस मात्र मी taxi लावली आणि काही शब्द त्या चालकांकडून शिकून घेतले. थोडेसे शब्द येऊ लागल्यानंतर मग ऑफिसची बसच लावली!! भाषा येत नसेल तर इथे कामे करून घेणे अवघड. वही, पेन घ्यायला मी ऑफिस स्टेशनरी स्टोर मध्ये गेलो, पण काही सेकंदातच बाहेर आलो. ते काय बोलत आहेत ते मला कळत न्हवते आणि त्यांना इंग्लिश येत न्हवते. "तमिळ तेरीयादी" - म्हणजे तमिळ येत  नाही एवढे शिकून घेऊन मात्र मला खूप उपयोग झाला.

चेन्नई मध्ये काही केलाम्बाक्कम, सेम्बक्कम, मीनाम्बाक्कम अशी काही "क्कम"कारान्त नावे फेकली कि राहणे / फिरणे अवघड नाही. बसचे नंबर पाठ करणे सोपे आहे. २१H, ८१B हे १४४ किवा २८१ लक्षात ठेवण्यापेक्षा सोपे आहे. शिवाय येत असणारे काही तमिळ आणि इंग्लिश शब्द मध्ये मध्ये पकडून वाक्यांचा अर्थ लावणेहि जमायला लागते. बस कंडक्टरशी बोलणे मला सर्वात अवघड गेले. तिकिटाचे पैसे मी तो योग्य ते परत करेल या आशेवरच देत असे. एका रिक्शावाल्याने मात्र भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन मला गंडा लावला होता.

चेन्नईत थोडे दिवस राहायला लागल्यावर आपल्याला ते शहर आवडायला लागते. इडली-डोसा तर आपला जीव कि प्राण असतोच. तिथली माणसे आणि त्यांचे स्वभाव एकदा समजले कि मग इकडे तिकडे फिरायचा उत्साह येतो. मी ज्या गेस्ट हाउस वर होतो तिथे अजय शर्मा नावाचा एक नेपाळी कूक आला. तो पोंडीचेरीला राहिला असल्याने उत्तम तमिळ बोलत असे. मी त्याच्याबरोबर पोंडीचेरी व मरिना बीचवर जाउन आलो. रोज  सकाळ संध्याकाळ भरपेट जेवण, नाश्ता, चहा इत्यादी सर्व मिळत होते.

अजय शर्मा  लाघवी माणूस होता. तो मला पोंडी दाखवायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर अरविंद आश्रमात जायच्या आधी मला एका बीअर बार मध्ये त्याने ओढून नेले. तिथे दोन ग्लास मारल्यावर आम्ही डुलतच योगी ओरोबिन्दो आश्रमात पोहोचलो. आम्ही दारू घेऊन आलो आहोत असा कुणाला संशय आला नाही. आश्रम बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून फक्त अरविंदांच्या समाधीचे दर्शन घेतले. तिथे रांगेत उभे असताना हा शाबजी बडबड करू लागला. मला वाटले आता दोघांना बाहेर काढतात वाटते! कसेबसे तिथे आवरते घेऊन आम्ही बीच वर आलो. पोंडी गाव सुंदर आहे, फ्रेंच प्रभाव अजूनही जाणवतो. घरांची बांधकामे फ्रेंच आर्किटेक्चरचे उत्तम नमुने आहेत.

आम्ही चेन्नईहून १ वाजता निघून ३:३० ला तिथे पोहोचलो होतो. ९ वाजता पुन्हा निघायचे असल्याने  ४-५ तासात जमेल तेवढे बघून घ्यायचे होते. बीच वरून जरा फेरफटका मारून जेवायला गेलो. तिथे पण साहेबांनी ३/४ बीअरच्या बाटल्या मागवल्या. तो मला पैसे देऊ देत नव्हता - पण मी त्याला रोखले. आता जायची वेळ झाली म्हणून आम्ही बस स्टेंडकडे जाऊ लागलो. तर पुन्हा याला बीअर मारायची हुक्की आली! सर जरा ठंडा पिके आता हू असे म्हणून हा पुन्हा जाऊ लागल्यावर मी त्याच्यावर रागावलो. मग घाबरून तो परत फिरला. इकडे गेस्ट हाउसवर इन्स्पेक्शन ला कोणी आले असते तर आम्हा दोघांना हाकलले असते!

ऑफिसमध्ये सर्वानन भवनची कॅण्टीन होती. प्रचंड महाग.  सकाळचा नाश्ता  रु.३० ला मिळते असे, हाच पुणे ऑफिस ला १-२ मध्ये. क्वालिटी चांगली असली तरी एवढे पैसे नाश्त्याला द्यायला लोक वैतागले होते. त्यामुळे तिथे एक चळवळ चालू झाली, अर्थात त्याला फारसे यश आले नाही.  दुसरा एक व्हेंडर स्वस्त देत असे म्हणून जर बरे!

अशा रीतीने महिना घालवल्यानंतर एक दिवस जायची वेळ झाली. माझे सोबती अजय शर्मा आणि कमल यांना टाटा करून टक्सी बोलाविली. तर पुन्हा  तोच  राजकुमार मला सोडावयास आला होता! अशा रीतीने आमची चेन्नई स्वारी पूर्ण होऊन पुन्हा आपल्या पुण्यास यावयास निघालो…




No comments:

Post a Comment